पूर्वी प्रियव्रत नावाचा एक धर्मशील व कीर्तीमान राजा होता. त्यास कीर्ती व प्रभा अशा दोन राण्या होत्या. तो राजा प्रभेच्या पूर्ण आहारी गेला. थोरली पत्नी कीर्ती त्याला आवडत नसे. एकदा प्रभेने कीर्तीला अपमानीत केले, लाथ मारुन हाकलून दिले. त्यामुळे अत्यंत निराश होऊन विष प्राशन करुन आपल्या देहाचा नाश करावा असे तिला वाटू लागले. अशा विव्हल अवस्थेत ती असताना देवल नावाच्या ऋषिंनी तिला गजाननाची उपासना सांगितली. कीर्तीने लगेच मंदारवृक्षाच्या लाकडाची गणेशमूर्ती तयार करुन त्याच्या उपासनेसे आरंभ केला. कीर्तीने गजाननाची षोडशोपचारे पूजा केली. दुर्वा, पुष्पे, दक्षिणा अर्पण करुन मनोभावे नमस्कार केला. हात जोडून प्रार्थना केली. त्याच्या परात्पर, विश्वव्यापी, अनादी, अनंत, सर्वांचे आदिकरण अशा स्वरुपाची स्तुती केली.
अशा रीतीने कीर्ती रोज गजाननाची उपासना करीत असता जेष्ठाच्या महिन्यातील एके दिवशी तिच्या सख्या गजाननासाठी दुर्वा आणावयास गेल्या. पण त्यांना दुर्वा मिळाल्या नाहीत म्हणून त्यांनी शमीची पाने आणून ती कीर्तीला दिली. कीर्तीने दुर्वा मिळेपर्यंत भोजन करावयाचे नाही अशी प्रतिज्ञा करुन शमीच्या पानांनी गजाननाची पूजा केली. तथापि शमी गजाननाला प्रिय असल्याने तो तिच्यावर प्रसन्न झाला. स्वप्नात तिला दृष्टांत देऊन म्हणाला, "तू शमीच्या पानांनी माझी पूजा केलीस म्हणून मी प्रसन्न झालो आहे. तुझा पती तुला वश होईल. तुला माझी भक्ती करणारा पुत्र होईल. त्याचं तू क्षिप्रप्रसादन असं नाव ठेव. चौथ्या वर्षी तो विषप्रयोगानं मृत होईल, पण गुत्समद ऋषी त्याला पुन्हा जिवंत करतील. नंतर तो चिरायू होऊन सुखानं राज्य करील."
कालांतराने प्रियव्रत राजाची आवडती राणी प्रभा निस्तेज झाली आणि तिला रक्तपिती भरली. पुढे गणेशाच्या प्रेरणेने तो राजा कीर्तीच्या घरी आला आणि तिच्या अधीन झाला. यथाकाल तिला पुत्र झाला. असूयेने तिच्या मुलावर प्रभेने विषप्रयोग केला. कीती आपल्या मृतपुत्राला घेऊन अरण्यात जाऊन शोक करीत ती गजाननाचे स्तवन करु लागली. दैवयोगाने त्याच वेळी सूर्याप्रमाणे तेजस्वी, महाबुद्धीवान आणि गजाननाचे परमभक्त गुत्समद ऋषी त्या वाटेने चालले होते. त्यांना तिच्या दु:खाने करुणा आली आणि ते म्हणाले "तू पूर्वी शमी पत्रानं गजाननाची पूजा केलीस. ते पुण्य जर या बालकाला दिलेस तर तो पुन्हा जिवंत होईल." त्यांचे हे भाष्य ऐकून राणीला परमानंद झाला. तिने तात्काळ शमीच्या पूजनापासून प्राप्त झालेले पुण्य त्या बालकाच्या हातावर सोडले. असे करताच अमृतवृष्टी झाल्याप्रमाणे तिचा सुकुमार पुत्र जिवंत झाला. राणीच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने त्या थोर ऋषींचे पाय धरले. त्यांना शमीचे माहात्म्य विचारले. त्यावर गुत्समद म्हणाले, "शमीचं नुसतं नाव घेता अनंत पापांचा नाश होतो."
3 comments:
शितल, छान समजले शमी महात्म्य. ध्रन्यवाद
Very informative.
ध्रन्यवाद!
टिप्पणी पोस्ट करा