श्रीगणेशास 'पाश', 'अंकुश', 'कमल' आणि 'परशू' ही आयुधे कशी प्राप्त झाली ते पाहूयात -
गणेशास सहावे वर्ष लागताच देवांचे वास्तुकला तज्ज्ञ मानले जाणारे विश्वकर्मा बालगणेशास भेटायला आले व त्यांनी पाश, अंकुश, कमल आणि परशू अशी चार आयुधे श्रीगणेशास दिली. त्यावर बालगणेशाने त्यांना विचारले "ही आयुधे तुम्ही कुठून मिळवलीत?" त्यावर विश्वकर्माने उत्तर दिले -
माझी संज्ञा नावाची सुंदर कन्या आहे. तिला मी विवाह विधीने सूर्यास अर्पण केली. पण तिला सूर्याचे तेज सहन होईना, मग संज्ञेने आपल्या प्रभावाने छायेस निर्माण केलं आणि तिच्यावर सर्व गोष्टी सोपवून ती लगेच माझ्या घरी परतली. पुढे अनेक दिवसांनी सूर्याने ती छाया असून संज्ञा नाही हे जाणलं. सूर्यदेव लगेच माझ्या घरी आला. यावर घाबरलेली संज्ञा मला विनवनी करु लागली, "तात, मला पुन्हा रविच्या स्वाधीन करु नका. याचं तेज मला सहन होत नाही". संज्ञेचे ते बोलणे ऐकून मी तिचा धिक्कार केला असता ती लगेच बाहेर गेली व घोडीचे रूप घेऊन गुप्तरुपाने वनात जाऊन राहीली.
नंतर ती घरात नाही हे पाहून मी सूर्यास म्हणालो, "तुझं तेज सहन होत नसल्यानं ती कुठं गेली ते मला ठाऊक नाही. तुझ्या तेजाचा काही भाग कमी होईल तर ती प्रकट होईल, मग तू तिच्याबरोबर विहार कर". त्यावर रविने "तुमच्या मनात जे असेल ते करण्यात तुम्ही समर्थ आहात" असे म्हणून मान्यता दिली. नंतर मी रविला यंत्रावर घालून किंचित खरवडलं व त्यामुळे त्याच्या तेजाची तिव्रता कमी झाली. मग जिथे संज्ञा गुप्त होऊन राहिली होती तिथे रवि गेला व ते दोघे आनंदानं स्वर्गलोकी गेले.
विश्वकर्मा पुढे सांगू लागला, रविच्या तासून काढलेल्या प्रखर तेजानं गणेशा ही आयुधं तुच्यासाठी मी तयार केली आहेत. ती अति तिक्ष्ण असून काळासही सदा जिंकणारी आहेत. पाश, अंकुश, कमल आणि परशू ही चार आयुधं मी तुला दिली तर चक्र आणि गदा ही दोन आयुधं मी हरीस दिली आहेत तर सर्व शत्रूंचं निर्दालन करणारा त्रिशूळ मी शंकरास दिला आहे.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा